Jul15

Posted by Dr. Shriniwas Kashalikar on Friday, 15th July 2016
महत्व नामसंकल्पाचे: डॉ. श्रीनिवास कशाळीकरनामस्मरण करणे ही प्रवाहाविरुद्ध पोहण्याची क्रिया आहे. मनाच्या मुळाशी जाण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आपल्या अंतर्मनातील कितीतरी विचार, भावना, वासना; या प्रक्रियेबद्दल संशय आणि कंटाळा उत्पन्न करतात. त्यामुळे आस्था आणि ओढ कमी होते आणि आपले नामस्मरण नकळत कमी कमी कमी होत जाते. पुष्कळदा हे आपल्या ध्यानातही येत नाही. इतर बाबी मनासारख्या झाल्या किंवा न झाल्या तरीही त्या समाधान देऊ शकत नसल्यामुळे मनामध्ये पोकळी तयार होते आणि खिन्नता पुष्कळदा फारच वाढते.
अश्यावेळी सदगुरूच आपल्यासाठी "नामसंकल्प" हा रामबाण उपाय; या ना त्या माध्यमातून उपलब्ध करतात. नामसंकल्पामुळे रोजच्या जीवनाला एक हेतू मिळतो आणि नामस्मरणाच्या क्रियेला एक प्रकारचा नेमकेपणा, आखीवपणा, निश्चितपणा आणि आकर्षकपणा येतो. त्याबद्दल नकळत बांधिलकी तयार होते. नामस्मरण पुन्हा रुळावर आले की मनातली पोकळी गुरूंच्या आठवणीने, गुरुवरील भक्तीने आणि तज्जन्य उत्साहाने भरून जाते आणि खिन्नता पार निघून जाते.
नामसंकल्पयुक्त नामस्मरणाचे चैतन्याधिष्ठान आणि सद्गुरुंची गोड ओढ यानी रटाळ क्षण उत्साहवर्धक बनतो, कंटाळवाणा दिवस सण बनतो आणि निरर्थक आयुष्य कृतार्थ बनते! कुणीही हे करून पाहिले तर याचा अनुभव येऊ शकेल.